“आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार”; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Patna Opposition Unity Meeting : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपविरोधात (BJP) जोरदार मोर्चेबांधणी करण्यासाठी पाटण्यात (Patna) पहिल्यांदाच विरोधी पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सपा प्रमुख अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. विमानतळावर महत्त्वाच्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार स्वतः पोहोचले होते. ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, मेहबूबा मुफ्ती, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते गुरुवारीच पाटण्याला पोहोचले होते. नितीश कुमार यांच्या  निवासस्थानी सकाळी 11 वाजता विरोधी पक्षांची बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत भाजपविरोधातील देशव्यापी महाआघाडीवर चर्चा होणार आहे. जागावाटप, नव्या आघाडीचे नाव आणि अन्य मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते चर्चा करणार आहेत. या बैठकीत सर्व नेते आपला अजेंडाही ठेवणार असून, त्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, पाटणा येथील सदकत आश्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाष्य केले आहे. सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन 2024 च्या निवडणुका एकत्र लढवायच्या आहेत. राहुल गांधी यांनी यासाठी पावले उचलली आहेत. याच उद्देशाने आम्ही आज पाटणा येथे बैठक घेत आहोत. तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. बिहार काँग्रेसची विचारधारा कधीही सोडू शकत नाही. बिहार जिंकला तर संपूर्ण भारत जिंकू, असे खर्गे म्हणाले. तर सध्या भारतात भारत जोडो आणि भारत तोडो या विचारसरणीमध्ये लढा सुरू आहे. म्हणूनच आज आपण बिहारमध्ये आलो आहोत. काँग्रेसचा डीएनए बिहारमध्ये आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“भारत जोडो यात्रेत तुम्ही मदत केलीत कारण तुम्ही विचारधारेला मानता. भाजप देशाला तोडण्याचे काम करत आहे, द्वेष परवण्याचे काम करत आहे. काँग्रेस पक्ष जोडण्याचे काम करत आहे. द्वेषाला द्वेषाने नाहीतर प्रेमाने मात दिली जाऊ शकते. त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलत आहोत. आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार आहोत. कर्नाटकमध्ये भाजपने मोठी भाषणे केली पण काय झालं ते तुम्हीसुद्धा पाहिलं आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश राजस्थानमध्ये काँग्रेस निवडून येणार आहे. कारण सगळ्या देशाला कळलं आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपचं काम देशातल्या दोन तीन लोकांनाच फायदा मिळवून देणे आहे. देशातला सगळा पैसा त्यांच्या हवाली करणे. तर काँग्रेसचा अर्थ म्हणजे गरिबांसोबत उभं राहणं. तुम्ही इथे आलात म्हणून मी तुमचे आभार मानतो,” असे राहुल गांधी म्हणाले.

Related posts